राज्याच्या राजकारणात गेल्या काही तासांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री भेट’ या वृत्तावर आता मुख्यमंत्र्यांनीच पूर्णविराम दिला आहे. नाशिक येथे आयोजित एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी हे वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट केले. तसेच, अफवा पसरविणाऱ्या हँडल्सवर कारवाईचा इशाराही दिला.
मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण – ‘अशी कुठलीही भेट झालेली नाही’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक येथील त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर ‘गोदा ते नर्मदा जल यात्रे’च्या शुभारंभ कार्यक्रमात ते सहभागी झाले. यावेळी पत्रकारांनी त्यांना थेट प्रश्न विचारला – ‘उद्धव ठाकरे यांच्याशी मध्यरात्री दोन वाजता भेट झाली का?’
यावर फडणवीस यांनी निर्विकारपणे उत्तर देताना म्हटले,
“उद्धव ठाकरे यांना माझ्याशी बोलायचे असेल तर लपून-छपून भेटण्याची कोणतीही गरज नाही. अशी भेट उघडपणे होऊ शकते. आमच्यात असे काही विषय नाहीत की जे लपवावे लागतील. प्रत्यक्षात अशी कुठलीही भेट घडलेली नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या पसरवतात. अशा खोटारड्या हँडल्सना योग्य ती नोटीस बजावली जाईल.
संजय राऊत यांचे मौन – ‘फडणवीस आणि ठाकरेच बोलतील’
या वृत्ताने राज्यात खळबळ उडाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया उत्सुकतेने पाहिली जात होती. मात्र, राऊत यांनी या प्रकरणी कोणतीही भूमिका घेतली नाही. ते म्हणाले,
“या विषयी मला काहीही माहिती नाही. ही फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बाब आहे; तेच यावर बोलतील.”
राऊत यांच्या या भूमिकेमुळे प्रकरणात अधिक रहस्य निर्माण झाले होते, मात्र आता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर सस्पेन्स संपुष्टात आला आहे.
काय होता तो वादग्रस्त दावा?
हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला तो ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे. सूत्रांच्या हवाल्याने या माध्यमाने दावा केला होता की,
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची रात्री २ वाजता गुप्त भेट झाली.”
या बातमीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. विशेषतः विधान परिषदेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता अनेक तर्कवितर्क लढवले गेले. एकीकडे शिवसेना-भाजप युतीच्या शक्यतेची चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे ‘सीट शेअरिंग’चे गणितही पुढे आणले जात होते.
मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी स्वतःच या दाव्याला पूर्णपणे खोटे ठरविल्याने या प्रकरणावर पडदा पडला आहे.
खोट्या हँडल्सवर कारवाई?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरविणाऱ्या हँडल्स’ना नोटीस देण्याचा इशारा दिला आहे. यामुळे सोशल मीडियावर चालणाऱ्या राजकीय अफवांच्या फेऱ्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणी अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.















Comments 1