
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता हा अपघात की घातपात याबाबत वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी अजितदादांच्या अपघाताचा थेट संबंध नाशिकमधील भोंदू अशोक खरातशी जोडला आहे.
“अजितदादांचा विमान अपघात प्रकरण संदर्भात नराधम अशोक खरात व त्याच्या आश्रमात झालेल्या अघोरी पूजेचा संबंध असल्याची सर्वांना शंका होतीच,” असे म्हणत मिटकरी यांनी खरातच्या सीडीआर ची मागणी केली आहे. त्यांच्या मते, जानेवारी महिन्यातील सीडीआर काढल्यास हे रहस्य उलगडू शकते.
या खळबळजनक दाव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांबद्दल बोलल्या. त्यांचा दावा आहे की, अजित पवार यांचा अपघात ज्या दिवशी झाला (२८ जानेवारी) त्यापूर्वी, त्या दिवशी आणि त्यानंतर खरातच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल झाली.
दमानिया यांच्या माहितीनुसार:
२७ जानेवारी (अपघाताच्या एक दिवस आधी) खरातच्या खात्यातून १७ व्यवहारांचे मेसेज आले. २८ जानेवारी (अपघाताचा दिवस) तब्बल १९ मेसेज आले. २९ ते ३१ जानेवारी: अनुक्रमे १० आणि ८ असे एकूण १८ मेसेज आले.
एकूणच या चार दिवसांत ५४ एसएमएस व्यवहाराचे आले, ही बाब अत्यंत संशयास्पद आहे. दमानिया यांचा प्रश्न आहे की, अजित पवारांच्या निधनाशी संबंधित या महत्त्वाच्या दिवसांमध्येच खरातच्या खात्यावर एवढी मोठी आर्थिक उलाढाल का? त्यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
फडणवीस सरकारलाही उत्तरं द्यावी लागणार?
अमोल मिटकरी यांनी यापूर्वीही विमान अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी पायलट ‘सुसाइड बॉम्बर’ असल्याची शक्यता व्यक्त केली होती आणि राजीव गांधी यांच्या हत्येशी याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला होता. तर रोहित पवार यांनीही याबाबत संशय व्यक्त करत या सर्व घटनांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या सर्व आरोपांनंतर सीएम देवेंद्र फडणवीस यांनीही प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. आता ही संपूर्ण प्रकरण कसे वळण घेते आणि काय नवीन माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












