मुंबईतील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी १ मेपासून होणार की त्यात बदल होणार, याबाबत असमंजसपणा निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे निर्णयावर ठाम असले, तरी शिंदे सेनेतील काही नेत्यांनी विरोध दर्शविल्यानंतर सरकारने पुनर्विचार सुरू केला आहे. आज होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत या विषयावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

ऑटो-टॅक्सी संघटनांची सरकारशी वाटाघाटी
मराठी सक्तीचा निर्णय एकदम लादल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात, अशी भूमिका ऑटो-टॅक्सी संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे संघटनांनी या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी सरकारशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. सरकारकडून निर्णयाला ढील दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.
आज मंत्री प्रताप सरनाईक यांची महत्त्वाची बैठक
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची आज (२८ एप्रिल) मुंबईत परिवहन आयुक्तांसोबत बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी १०:३० वाजता वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील ५९ आरटीओचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. मात्र, या बैठकीत ऑटो-टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बैठकीनंतर मराठी सक्तीविषयी सरकारचे अंतिम धोरण समोर येणार आहे.
दोन टप्प्यांत अंमलबजावणीची शक्यता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी सक्तीचा निर्णय दोन टप्प्यांत राबविण्यात येण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात येणार आहे. या कालावधीत कोणत्याही चालकाचा परवाना किंवा परमिट रद्द होणार नाही. दुसऱ्या टप्प्यात मराठी भाषा शिकण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे.
मुंबईत ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी वर्ग
सरकारने ऑटो-टॅक्सी चालकांसाठी विशेष मराठी वर्ग आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विविध शाळा, सरकारी कार्यालये आणि प्रशिक्षण केंद्रांचा वापर करण्यात येणार आहे. चालकांना सहा महिने मोफत मराठी शिक्षण देण्यात येणार आहे.
हे पण वाचा
गुप्त धनाच्या लालसेचा खेळ, खड्ड्यामुळे गावात भीतीचे वातावरण .. वाचा सविस्तर
आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे होणार जाहीर वाचन,
दोन पानी पुस्तकाचे प्रकाशन
मराठी शिकण्यासाठी सरकारकडून एक सोपे दोन पानी पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तकात चित्रांच्या साहाय्याने मराठी शिकवण्यावर भर देण्यात येणार आहे. विविध साहित्यिक, प्राध्यापक आणि मराठी भाषेचे जाणकार चालकांना मराठीचे धडे देणार आहेत. तसेच मराठी भाषेचा इतिहासही त्यांना समजावून सांगितला जाणार आहे.
प्रताप सरनाईक ठाम – ‘मुंबईत व्यवसाय असेल तर मराठी हवीच’
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की, मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा अवगत असणे आवश्यक आहे. ते या निर्णयावर ठाम असून, सरकारने याबाबत कोणतीही ढील दिलेली नाही. मात्र, चालकांना संधी देण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे.













