नितीश कुमारांचा राजीनामा: काय घडलं?
बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सकाळी 11 वाजता त्यांनी शेवटची कॅबिनेट बैठक घेतली आणि त्यानंतर लोकभवन येथे जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
या घटनेमुळे बिहारच्या सत्तासमीकरणात मोठा बदल झाला असून, आता राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. दीर्घकाळ बिहारच्या मुख्यमंत्रिपदी असलेल्या नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रीय राजकारणाकडे वाटचाल
नितीश कुमार यांनी आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच त्यांनी 10 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्लीत राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. उपराष्ट्रपती तथा राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली.
नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे त्यांचे समर्थक आणि पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात निराशा आहे. तथापि, केंद्र सरकारसोबत देशपातळीवर काम करण्याची त्यांची इच्छा असल्याचे समजते. या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.
भाजपचा पहिला मुख्यमंत्री: सम्राट चौधरी
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये भाजपला प्रथमच मुख्यमंत्रीपद मिळण्याची चर्चा होती. आता ती चर्चा प्रत्यक्षात आली आहे. भाजपने सम्राट चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे.
बिहार भाजपचे अध्यक्ष संजय सरावगी यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विधिमंडळ गटनेतेपदी सम्राट चौधरी यांची निवड करण्यात आली. एनडीएच्या आमदारांची बैठक विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली, ज्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून शिवराज सिंह उपस्थित होते.
हे पण वाचा
महाराष्ट्र दिनापासून बदलणार नियम: रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य
सम्राट चौधरींचा ‘फेटा’
सम्राट चौधरी हे सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती आणि अलीकडेच त्यांच्या घराची सुरक्षादेखील वाढवण्यात आली होती.
विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची खुणगाठ बांधली होती. त्यावेळी त्यांनी डोक्यावर फेटा बांधला होता आणि जोपर्यंत नितीश कुमार यांना हटवत नाही, तोपर्यंत तो फेटा काढणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. आता भाजपने त्यांनाच संधी देत विधिमंडळ गटनेतेपदी निवडले आहे.
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. सत्ताधारी जदयू आणि भाजपने आमदारांची बैठक बोलावली होती. सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाजप बिहारमध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद सांभाळणार आहे. बिहार राज्याच्या राजकारणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे













