
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी चाकणकर यांच्यावर महिलांच्या लैंगिक अत्याचारात थेट सहभागी असल्याचा ठपका ठेवला आहे. हे आरोप राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे आहेत.
रुपाली ठोंबरे पाटील यांचे गंभीर आरोप
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, “दहावी नापास कोंबडी चोराच्या भोंदू बाबाच्या ट्रस्टवर तुम्ही आहात. तुमच्या माध्यमातून महिलांवर लैंगिक अत्याचार झाले. तुम्हाला अटक झाली पाहिजे, का होत नाही?” त्यांनी पुढे सांगितले की, चाकणकर यांनी केवळ महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करून भोंदूबाबाला पाणी पुरवले नाही तर त्यांना बळी पडलेल्या महिलांना धमकावले. ठोंबरे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, चाकणकर यांनी आपल्या सत्तेचा वापर करून पुरावे नष्ट केले आहेत.
एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ठोंबरे पाटील यांनी पुढे दावा केला की, अशोक खरातविरुद्ध सुमारे 250 ते 300 व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात अनेक महिलांचे शोषण करण्यात आले आहे. तसेच, या सगळ्या प्रकरणात एक मोठा कट असल्याचे त्यांनी सांगितले.
‘फरार’ पोस्टचे कारण स्पष्ट करताना…
ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टदेखील चांगलीच चर्चा झाली होती, ज्यात त्यांनी चाकणकर ‘फरार’ असल्याचे म्हटले होते. यावर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, “रुपाली चाकणकर यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसता तर त्या आपल्यासमोर येऊन बोलल्या असत्या. त्यामुळेच मी त्या ‘फरार’ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी भोंदू बाबाला साथ दिली आणि महिलांचा बलात्कार घडवून आणला आहे.”
पोलिसांवरच संरक्षणाचा आरोप?
रुपाली ठोंबरे पाटील यांनी केवळ चाकणकर यांच्यावरच नव्हे तर पोलिस प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्याची एसआयटी चौकशी ही पारदर्शी होत नसून, पोलीस रुपाली चाकणकर आणि तिच्या कुटुंबीयांना वाचवत आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “पोलीस चाकणकर आणि चाकणकरच्या परिवाराला वाचवत आहेत.”
याप्रकरणी ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक करण्याची आणि त्यांना सहआरोपी म्हणून तपासात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, चाकणकर यांच्यासोबत त्यांच्या ‘टोळीतील’ इतर महिलांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हे सुद्धा वाचा
आयआयटी वाले बाबा विवाह बंधनात अडकले…. वाचा सविस्तर
पत्रकारांचे प्रश्न थांबता कामा नये – आमदार अमीन पटेल
चाकणकर यांचे स्पष्टीकरण
या सर्व आरोपांवर रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत, या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. चाकणकर म्हणाल्या, “हा माझ्या बदनामीसाठी केलेला कट आहे. मी सुरुवातीपासूनच स्पष्ट केले आहे की, माझा या गैरव्यवहाराशी थेट किंवा अप्रत्यक्ष काहीही संबंध नाही.” त्यांनी माहिती दिली की, खरात यांच्याशी त्यांचे कौटुंबिक गुरू म्हणून संबंध होते आणि त्यांचे पाय धुण्याचा व्हिडिओ ५-६ वर्षांपूर्वीचा आहे. हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारंपारिक कार्यक्रमाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, २८ दिवसांनी मौन सोडत त्यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली आहे.
अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढले आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. दोन्ही नेत्या एकाच पक्षातील (राष्ट्रवादी काँग्रेस) असल्याने हा वाद आता पक्षांतर्गत संघर्षाचे रूप धारण करत असल्याचे दिसते. रुपाली चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असले, तरी याप्रकरणी पुढील तपास आणि मुख्यमंत्र्यांचे निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














