भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. तरुण स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीत एक नवा अध्याय जोडला जाण्याची शक्यता आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अलीकडील सामन्यात तो अपयशी ठरला असला, तरी त्याच्या भवितव्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वृत्तांनुसार, या 15 वर्षांच्या युवा क्रिकेटपटूची निवड जूनमध्ये होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी होऊ शकते.
वैभव सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्ध संधी?
‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, BCCI (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) वैभव सूर्यवंशीला आगामी काळात मोठी संधी देण्याच्या तयारीत आहे. इंग्लंडविरुद्धच्या व्हाइट बॉल मालिकेपूर्वी, त्याला आयर्लंडविरुद्धच्या T20 मालिकेत संधी दिली जाऊ शकते. बीसीसीआय सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या या वृत्तात, वैभव सोबत आणखी एका खेळाडूच्या नावाची चर्चा आहे.
सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरणार?
जर वैभव सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारताचा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरेल. यापूर्वीही अनेक खेळाडूंनी लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे, मात्र वैभवचे वय ही त्याची सर्वात मोठी खासियत ठरणार आहे.
वैभव सूर्यवंशीला संधी का दिली जाऊ शकते?
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजी हीच त्याच्या निवडीमागील सर्वात मोठी कारणे आहेत. सलामीवर फलंदाजीला उतरताच तो विरोधी संघावर जोरदार प्रहार करतो, ज्यामुळे विरोधी संघावर मानसिक दबाव निर्माण होतो. गेल्या वर्षभरापासून तो सातत्याने चर्चेत आहे.
विशेष म्हणजे, IPL 2026 मध्येही त्याने आपल्या दमदार कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत त्याने अनेक दिग्गज गोलंदाजांची धुऊळ उडवली आहे आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो अव्वल स्थानी आहे.
हे पण वाचा
आयसीसीचे नियम काय सांगतात?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमांनुसार, आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी खेळाडूचे किमान 15 वर्षे वयोमान असणे आवश्यक आहे. वैभव सूर्यवंशीचे वय 15 वर्षे असल्याने, तो या नियमाची पूर्तता करतो. यापूर्वी, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही अत्यंत लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि पाकिस्तानविरुद्ध अविस्मरणीय खेळी केली होती.
सध्या चाहत्यांची मागणी आहे की, वैभव सूर्यवंशीला संधी दिली जावी, जेणेकरून तो आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवू शकेल. आता BCCI काय निर्णय घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.













