महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्ह्यातून एका निनावी पत्राने मोठी हलचाल निर्माण केली आहे. या पत्रात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीविताला आणि सामाजिक प्रतिष्ठेला धोका असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा धोका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांच्याकडून असल्याचे पत्रात म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्रामुळे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
निनावी पत्रातील आरोप काय आहेत?
व्हायरल झालेल्या या निनावी पत्रात प्रज्ञा खोसरे यांच्यावर एकापेक्षा एक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पत्रानुसार, प्रज्ञा खोसरे या कुख्यात ‘भोंदू बाबा’ अशोक खरात यांच्या हस्तक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे महिलांना नेण्याचे काम त्या करतात, असा गंभीर दावा पत्रात करण्यात आला आहे.
हुंड्याचा छळ आणि गर्भलिंग चाचणीचे आरोप
पत्रात पुढे म्हटले आहे की, प्रज्ञा खोसरे यांनी आपल्या भावाच्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केला. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २००९ मध्ये एफआयआरही दाखल करण्यात आली होती. तसेच, त्यांनी स्वतः ४-५ वेळा गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा आणि इतर महिलांनाही पुत्रप्राप्तीसाठी डॉक्टरांकडे नेल्याचा आरोपही या पत्रात आहे.
पदाचा गैरवापर आणि सुनेत्रा पवार यांना धोका
पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, प्रज्ञा खोसरे यांनी रूपाली चाकणकर यांच्यामार्फत चुकीची माहिती देऊन बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षपद मिळवले. या वादग्रस्त भूमिकेमुळे पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खोसरे यांना तातडीने सर्व पदांवरून हटवावे, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
प्रज्ञा खोसरे यांचं स्पष्टीकरण ‘ही राजकीय कारस्थानं’
या सर्व आरोपांनंतर प्रज्ञा खोसरे यांनी स्वतःचा बचाव करताना आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या
“कुठलाही ठोस पुरावा नसताना केवळ निनावी पत्र व्हायरल करून माझी बदनामी केली जात आहे. मी अशोक खरातचा जाहीर निषेध करते. त्याला कडक शिक्षा व्हायला हवी, हीच माझी भूमिका आहे,” असे खोसरे यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “दादा (अजित पवार) गेल्यानंतर सुनेत्रा वहिनी आमच्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांच्या शब्दावर आणि पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार आम्ही काम करत आहोत.
त्यांनी या निनावी पत्रामागील कारस्थान करणाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. “यामुळे केवळ माझीच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्याची आणि महिलांची बदनामी होत आहे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. प्रज्ञा खोसरे या अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हे निनावी पत्र हा केवळ राजकीय डावपेच असू शकतो. तरीही, उपमुख्यमंत्र्यांच्या जीविताला धोका असल्याचा उल्लेख असल्याने पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. तपासाची मागणी वाढत असताना, खोसरे यांनी कायदेशीर पाऊल उचलण्याची तयारी दर्शवली आहे.
पुढील काही दिवसांत याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच, पक्षातील अंतर्गत वादही उघडकीस येऊ शकतो. या निनावी पत्रामागे कोणाचा हात आहे, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.













