महाराष्ट्राच्या राजकारणात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे महाविकास आघाडी (एमव्हीए) समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आपला उमेदवार जाहीर केला असला, तरी काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा मनोदय दर्शविल्याने आघाडीत बिघाड झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्ली गाठून पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू केली आहे.

‘काँग्रेसचा स्वतंत्र उमेदवार देण्याचा मानस?’
सुरुवातीला काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस आता स्वतःचा उमेदवार रिंगणात उतरवू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांच्याशी काँग्रेसची थेट टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत असून ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठका घेत आहेत. या चर्चेनंतर काँग्रेस आपल्या उमेदवाराचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्याची शक्यता आहे. शिवसेनेने आपले नाव पुढे केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे.
अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया – ‘मी महाविकास आघाडीचा उमेदवार’
या संपूर्ण पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, “मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, एवढेच मला माहिती आहे. उर्वरित निर्णय पक्षनेतृत्व घेईल. उद्धव ठाकरे याच संदर्भात योग्य ती भूमिका मांडतील.”
काँग्रेसशी झालेल्या वाटाघाटीबाबत विचारले असता दानवे म्हणाले, “संजय राऊत यांचे ट्वीट पहा. त्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार असे म्हटले आहे, याचाच अर्थ काँग्रेसशी चर्चा झालेली आहे. मी काँग्रेसशी कसा बोलणार? मला माझ्या पक्षाने उमेदवारी दिली आहे आणि पक्षनेतृत्व या निर्णयाची जबाबदारी घेईल.”
हे पण वाचा
निकालापूर्वीच कर्डिलेंच्या अभिनंदनाचे झळकले फ्लेक्स…. वाचा सविस्तर……
महाविकास आघाडीत फूट पडणार का?
राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे महाविकास आघाडीचे भवितव्य ठरू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेने दानवे यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसनेही आपला उमेदवार दिला, तर आघाडीतील दोन मोठ्या पक्षांमध्ये थेट सामना होईल. मात्र, अद्यापही काँग्रेसचा अधिकृत निर्णय समोर आलेला नाही. हर्षवर्धन सपकाळ यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर काँग्रेसचा निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
आगामी काही दिवसांत महाविकास आघाडीत सलोखा राहणार की फूट पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













