धनुष्यबाण हाती घेणार, – बच्चू कडू
महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीपूर्वी मोठी हालचाल सुरू झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व आक्रमक नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मात्र, आता स्वतः बच्चू कडू यांनी याबाबत मोठे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ हाती घेतला, तरीही शेतकरी, मजूर, दिव्यांग आणि विधवा बहिणींच्या हितासाठी आपली लढाई सुरूच राहील, अशी ग्वाही दिली आहे.
नेमके काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, गेल्या दोन दिवसांत ज्या चर्चा झाल्या, त्या शिवसेनेने मान्य केल्या आहेत. ‘मी शेतकरी, मजूर, दिव्यांग यांच्यासाठी धनुष्यबाण हाती घेणार आहे. पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे शासनाने घ्यावीत, हमीभावात सुधारणा व्हाव्यात, अशा मागण्यांसाठी मी लढत राहीन,’ असे ते म्हणाले.
लाडकी बहीण योजनेतील विधवांकडे लक्ष
बच्चू कडू यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेतील विधवा बहिणींच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. ‘त्या बहिणी अद्याप कोरड्याच राहिल्या आहेत. तसेच, दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली असली, तरी त्याचे बळकटीकरण झाले नाही. हे सर्व मुद्दे मान्य झाल्यानंतरच मी हा निर्णय घेत आहे,’ असे त्यांनी सांगितले.

‘शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी रक्ताचा थेंब थेंब खर्च करेन’
बच्चू कडू यांनी शिवसेनेबद्दलची निष्ठा व्यक्त करताना म्हटले की, ‘माझ्या शरीरातील प्रत्येक थेंब शिवसेनेसाठी धावणार आहे, तसाच तो शेतकऱ्यांसाठीही धावणार आहे. कारण शेतकरी, मजूर, दिव्यांग यांच्याशी समझोता होऊ शकत नाही. राजकीय प्रवास आम्ही शिवसेनेतून केला होता. माझ्याकडे बाळासाहेब ठाकरे यांना लिहिलेले पत्र अजूनही आहे, ज्यात कर्जमाफीची मागणी केली होती.’
प्रहार संघटना कायम राहणार
बच्चू कडू यांनी हेही स्पष्ट केले की, ‘प्रहार सामाजिक संघटना’ आणि ‘प्रहार दिव्यांग संघटना’ कायम राहतील. पूर्ण ताकदीने शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी काम करेन, पण शेतकऱ्यांच्या लढाईत एक इंचही फरक पडू देणार नाही. कोणत्याही बदल्यात समझोता होणार नाही, हे मी निश्चित केले आहे.
कापसाच्या भावासाठी दिला होता राजीनामा
आपला राजकीय इतिहास सांगताना बच्चू कडू म्हणाले, ‘कापसाच्या भावासंदर्भात आम्ही पूर्वी राजीनामा दिला होता. पुन्हा एकदा शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या मुद्द्यांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन लढण्यासाठी सज्ज झालो आहे.’ त्यांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे जुळण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा
निर्मळ पिंपरीत गर्भलिंग तपासणीवर पोलिसांचा छापा, डॉक्टरसह एजेंट ताब्यात..वाचा सविस्तर
राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वावर विश्वास
बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास व्यक्त करताना सांगितले की, ‘शिंदे साहेबांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केले, पण त्याचे बळकटीकरण व्हायला हवे. यासाठी मी पाठपुरावा करेन. बच्चू कडू यांचे काम नेहमी प्रामाणिक राहिले आहे, आणि पुढेही तसेच राहील.’
या सर्व विकासक्रमामुळे येत्या काळात बच्चू कडू यांचा शिवसेनेत होणारा प्रवेश आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील ताकदीचे समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत.














