
बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणूक (Baramati By-Election 2026) बिनविरोध होण्याची शक्यता आता अधिकच बळावली आहे. उमेदवारी अर्ज माघारीचा आज (दि. 9 एप्रिल) शेवटचा दिवस असताना, काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणातून काढून घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दुपारपर्यंत अर्ज परत घेण्याचे संकेत दिले आहेत. तथापि, पक्षाचा अधिकृत निर्णय अद्याप प्रलंबित असून, हायकमांडकडून मंजुरीची प्रतिक्षा आहे.
उमेदवारी माघारीचा आज शेवटचा दिवस
पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची संधी आहे. सकाळपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. याच भागात काँग्रेसनेही आपला उमेदवार मागे घ्यावा, यासाठी राजकीय पातळीवर हालचाली वाढल्या होत्या.
विजय वडेट्टीवार काय म्हटले?
काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, बारामतीमधील परिस्थिती आणि पक्षाच्या अनेक नेत्यांच्या भावना लक्षात घेता, या निवडणुकीत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले:
“उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. अजित दादांबद्दल अनेकांच्या मनात आदराची भावना आहे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा उमेदवार असल्याने, अनेक नेत्यांनी माघार घेण्याची भूमिका मांडली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व नेत्यांशी चर्चा करून ही बाब केंद्रीय श्रेष्ठींपर्यंत पोहोचवली आहे. दुपारपर्यंत हायकमांडची परवानगी मिळाली की, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.”*
वडेट्टीवार यांनी हेही सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही वारंवार बिनविरोध निवडणूक होण्याची विनंती करण्यात आली होती. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी फोनवर चर्चा करून सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची विनंती केल्याचे समोर आले आहे.
‘अधिकृत निर्णय झालेला नाही’ – काँग्रेसकडून स्पष्टीकरण
विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे माघार निश्चित झाल्याचे चित्र निर्माण झाले असले, तरी काँग्रेसचा अधिकृत निर्णय अद्याप समोर आलेला नाही. पक्षसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हायकमांडमध्ये अद्याप चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व इतर वरिष्ठ नेत्यांशी संवाद सुरू असून, त्यांचा आदेश प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही होईल.
काही सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसमध्येच या माघारीबाबत मतभेद आहेत. अधिकृत घोषणा होण्याआधीच वडेट्टीवार यांनी परस्पर माघारीची घोषणा केल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. त्यामुळे सध्या ही बाब पक्षश्रेष्ठींच्या विचाराधीन असून, दुपारपर्यंत स्पष्टता येईल, असे समजते.
.
बिनविरोध निवडणुकीसाठी रंगले राजकारण
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी केवळ महायुतीच नव्हे, तर काँग्रेसच्या काही नेत्यांनीही पाठपुरावा केल्याचे दिसून आले. अजित पवार यांच्याशी असलेली जुनी नाळ आणि त्यांच्याबद्दलचा आदर याचा हा भाग असल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने यापूर्वी अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुकांना पाठिंबा दिले नसल्याची टीकाही काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली आहे.
मात्र, सध्याच्या घडीला बारामतीतील जनतेची भावना आणि राजकीय समीकरणे यामुळेच काँग्रेस माघार घेण्यास तयार झाल्याचे वडेट्टीवार यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले
दुपारपर्यंत काँग्रेस हायकमांडकडून कोणता आदेश येतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. जर काँग्रेसने अधिकृतपणे अर्ज मागे घेतला, तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होईल आणि सुनेत्रा पवार या निवडून येण्याची शक्यता निश्चित होईल. उलट, अखेरच्या क्षणी काँग्रेसने माघार न घेतल्यास दोन-तीन पक्षांत त्रिकोणी लढत होण्याची शक्यता आहे.
अद्याप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत अधिकृत वक्तव्य केलेले नाही. पुढील काही तासांमध्ये बारामतीच्या राजकीय समीकरणांवर शिक्कामोर्तब होईल, यात शंका नाही.












