जयपूरमध्ये रंगलेला रोमहर्षक सामना
आयपीएल २०२६ च्या ४३ व्या लढतीत जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जोरदार टक्कर झाली. दिल्लीने हा सामना जिंकला असला, तरी सामन्यातील एका वादग्रस्त घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन याच्या वर्तणुकीमुळे ही चर्चा रंगली.

वैभव सूर्यवंशीची विकेट आणि जेमिसनचा जल्लोष
या सामन्यात सर्वांच्या नजरा होत्या त्या राजस्थानचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीवर. नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर वैभवने डावाची सुरुवात केली. मात्र, ही सुरुवात अल्पकाळ टिकली. अवघ्या दोन चेंडूत एक चौकारासह ४ धावा करून तो बाद झाला.
वैभवला बाद करण्याचे श्रेय दिल्लीचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनला गेले. पण विकेटनंतर जेमिसनने केलेल्या आक्रमक जल्लोषामुळे संपूर्ण मैदानात एकच खळबळ उडाली. वैभव निराश होऊन पॅव्हेलियनकडे जात असताना, जेमिसनने त्याच्याकडे आक्रमकपणे धाव घेत आणि अतिरेकी जल्लोष करत सर्वांचे भुवया उंचावल्या.
बीसीसीआयची कारवाई: डिमेरिट पॉइंट आणि चेतावणी
जेमिसनच्या या वर्तणुकीची बीसीसीआयने गांभीर्याने दखल घेतली. त्याला आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. हे कलम सामन्यादरम्यान दुसऱ्या खेळाडूचा अपमान करणाऱ्या किंवा आक्रमक प्रतिक्रिया भडकवणाऱ्या भाषा, कृती किंवा हावभावाशी संबंधित आहे.
आयपीएलने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात म्हटले आहे, “सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या ४३ व्या सामन्यात खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांसाठी असलेल्या आयपीएल आचारसंहितेच्या स्तर १ चे उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज काईल जेमिसनला एक डिमेरिट पॉइंट आणि एक चेतावणी देण्यात आली आहे.”
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, “ही घटना पहिल्या डावाच्या दुसऱ्या षटकात घडली. वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर, जेमिसन त्याच्याकडे आक्रमकपणे जात असल्याचे आढळले, ज्यामुळे फलंदाजाकडून आक्रमक प्रतिक्रिया येऊ शकली असती. जेमिसनने आपली चूक कबूल केली आणि सामनाधिकाऱ्याने दिलेली शिक्षा स्वीकारली.”
दिल्लीचा दणदणीत विजय
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानने निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून २२५ धावा केल्या. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने हे आव्हान यशस्वीपणे पेलले.
दिल्लीने ३ गडी राखून आणि ५ चेंडू शिल्लक असताना २२६ धावांचा पाठलाग करत विजय मिळवला. या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. राजस्थान रॉयल्ससाठी हा पराभव निराशाजनक ठरला, तर दिल्लीसाठी हा विजय आत्मविश्वास वाढवणारा आहे.
हे पण वाचा
बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच बाजी मारली… वाचा सविस्तर
देशभरात अचानक वाजले मोबाईलचे सायरन; नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण













