वसंत मोरे यांच्याकडे पुण्याची कमान
उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ नेते वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मोरे यांना पुणे शहराचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आज सकाळी ठाकरे गटाकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. या नियुक्तीनंतर वसंत मोरे यांनी आभार मानताना म्हटले की, “उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. त्यांनी मला ही संधी दिली. आम्ही विरोधी पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका सशक्तपणे मांडू.”

संजय राऊत यांचा मोरे यांना कॉल
वसंत मोरे यांनी पुढे सांगितले की, “आज सकाळी संजय राऊत यांचा मला कॉल आला. त्यांनी सांगितले की पक्ष अधिक मजबूत करा. मी त्यांना आश्वस्त केले की मी त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक काम करेन. पक्षात काही मरगळ आली आहे, ती झटकून कृती करायला हवी. मला सर्व विधानसभा मतदारसंघात जनता दरबार आयोजित करायचे आहेत. जुने कार्यकर्तेही मी सोबत घेऊन काम करेन. दोन दिवसांत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेईन.”
‘मिसिंग लिंक’ शोधण्याचा इशारा
उल्लेखनीय म्हणजे, कालपरवा संजय राऊत पुण्यात आले होते. त्यांनी उद्धव सेनेचा एक मेळावा घेतला. पुढील तीन वर्षांत कोणतीही थेट निवडणूक नसल्याने, संघटनात्मक काम तळागाळात नेण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. “लोकांमधील ‘मिसिंग लिंक’चा शोध घ्या आणि ती जोडणी साधा. असे झाल्यास पुण्यात शिवसेना एक्स्प्रेसवेप्रमाणे सुसाट धावेल,” असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. तसेच पक्षात घटनात्मक बदलांचे संकेतही त्यांनी दिले होते. त्यानंतर आज वसंत मोरे यांची शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडसह अन्य पदांवर नियुक्त्या
फक्त पुणे शहरच नव्हे, तर पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी चेतन पवार यांची निवड करण्यात आली आहे. नितीन गावडे शहर समन्वयक म्हणून काम पाहतील. तर संजय मोरे व गजानन थरकुडे यांना सहसंपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. गौतम चाबुकस्वार यांच्याकडे पिंपरी-चिंचवडचे सहसंपर्क प्रमुखपद असेल. या नियुक्त्यांमुळे पुणे व परिसरात उद्धव सेनेची संघटना अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा
निर्मळ पिंपरीत गर्भलिंग तपासणीवर पोलिसांचा छापा, डॉक्टरसह एजेंट ताब्यात..वाचा सविस्तर
उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा सविस्तर
मुंबईच्या निवडणुकीचे पेच
दुसरीकडे, मुंबई विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत सध्या अस्वस्थता आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील बैठका सुरू असल्या तरी अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील ताणतणाव कायम आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जे करता आले नाही, ते ठाकरे गटाने पुण्यात साध्य केले आहे, असे राजकीय निरीक्षकांनी म्हटले आहे. विद्येच्या माहेरघरात पक्षाची पायाभरणी मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते.













