मुंबई: राज्यात उन्हाचा पारा वाढत असताना प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. आता यापुढे दुपारी १२ ते ४ या काळात कर्मचाऱ्यांना उन्हात राबवणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडले जाणार नाही. राज्य सरकारने याबाबत स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.
ट्रॅफिक पोलिस, डिलिव्हरी बॉय, मार्केटिंग कर्मचारी, बांधकाम मजूर अशा बाहेर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. कोणतीही संस्था किंवा वरिष्ठ अधिकारी या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांच्यावर प्रशासकीय व फौजदारी कारवाई होईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
१५ जिल्ह्यांवर विशेष लक्ष
राज्यातील अशा १५ जिल्ह्यांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे, जिथे तापमानाने उच्चांक गाठला आहे. या जिल्ह्यांमध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे, लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि नांदेड यांचा समावेश आहे.
या अति-संवेदनशील जिल्ह्यांमध्ये कामाच्या वेळेत तातडीने बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः खाणपट्ट्यातील कामगारांसाठी थंड विश्रांती केंद्रे आणि हवेशीर व्यवस्था अनिवार्य करण्यात आली आहे.
कामाच्या वेळेत बदल अनिवार्य
राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार (एसओपी) खालील बाबी बंधनकारक आहेत:
-
दुपारी १२ ते ४ या वेळेत कर्मचाऱ्यांना उन्हापासून संरक्षण मिळणे आवश्यक
-
ट्रॅफिक पोलिस, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, डिलिव्हरी कामगार, रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत त्वरित बदल करावेत
-
कर्मचाऱ्यांना दुपारच्या वेळेत सावलीत विश्रांती मिळेल, याची व्यवस्था करणे बंधनकारक
-
चंद्रपूरसह इतर खाण क्षेत्रात वायुवीजन व्यवस्था चोख ठेवावी
-
महिला कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत
‘कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही’
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “वाढत्या तापमानामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घालता येणार नाही. विशेषतः दुपारी १२ ते ४ या काळात कर्मचाऱ्यांना उन्हात राबवणाऱ्या कोणत्याही अधिकारी किंवा संस्थेची गय केली जाणार नाही. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कडक निर्देश देण्यात आले आहेत.”
तीन स्वतंत्र एसओपी तयार
मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी माहिती दिली की, “नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही तीन स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. विदर्भातील आणि खान्देशातील वाढत्या तापमानाचा अनुभव लक्षात घेऊन या सूचनांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल.”
उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा
जर एखादी संस्था किंवा वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना नियमांचे उल्लंघन करून दुपारच्या तीव्र उन्हात काम करण्यास भाग पाडत असेल, तर त्यांच्यावर प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. यापुढे कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, असा इशारा सरकारने दिला आहे.














