आयपीएल २०२६ चा पहिला टप्पा पार पडला असून स्पर्धा आता मध्यात आली आहे. प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत असली तरी स्पर्धेतील काही घटनांनी क्रिकेटच्या नियमांचे रक्षण करणाऱ्या मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी)चा संताप पत्करला आहे. एमसीसीच्या मते, आयपीएलमधील सामने गरजेपेक्षा जास्त लांबवले जात असून काही सामने तब्बल चार तास २२ मिनिटांपर्यंत चालत आहेत. यावर एमसीसीचे हेड ऑफ क्रिकेट फ्रेजर स्टीवर्ट यांनी कठोर प्रतिक्रिया नोंदवत पंचांवरच दंड ठोठावण्याची मागणी केली आहे.

एमसीसी प्रमुख काय म्हणाले?
मुंबई क्रिकेट असोसिएशनशी बोलताना फ्रेजर स्टीवर्ट यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘सामना वेळेत संपवणे हे पंचांचे काम आहे. पण जेव्हा प्रत्येक ब्रेकवर जाहिरात असते आणि कोट्यवधी लोक सामना पाहत असतात तेव्हा ते का होत नाही हे आम्ही समजू शकतो,’ असे ते म्हणाले.
‘पंचच नियमांची अंमलबजावणी करत नाहीत’
स्टीवर्ट यांनी पुढे नमूद केले की, नियमांमध्ये सामना वेळेत पूर्ण न झाल्यास इशारा आणि पाच धावांची दंडनीती देण्याची तरतूद आहे, मात्र पंच या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे प्रत्येक सामना संपण्यास उशीर होतो. त्यांनी एक आमूलाग्र सूचना देताना म्हटले की, ‘नियम इशारे आणि पाच धावांच्या दंडाला परवानगी देतात, पण पंच ती लागू करण्यास कचरतात. एक सूचना म्हणजे जर ओव्हर रेट खराब असेल तर पंचांनाच दंड ठोठावला जावा, ज्यामुळे सामना वेळेत संपण्याची खात्री होईल.’
स्टीवर्ट यांनी सोडून दिला सामना
या सामन्याबद्दल स्टीवर्ट यांनी एक धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले, ‘आम्ही दुसऱ्या डावातील सहा-सात षटकं पाहिली आणि स्टेडियममधून थेट हॉटेलसाठी रवाना झालो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचलो आणि टीव्ही चालू केला तेव्हा पाच षटकं शिल्लक होती.’ त्यांनी पुढे नमूद केले की स्टेडियममध्ये प्रचंड गोंगाट, जाहिरातींचे सतत ब्रेक आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीमुळे सामना पाहणे प्रत्यक्षात अवघड झाले होते. हॉटेलमध्ये टीव्हीवर सामना पाहणे अधिक आनंददायक ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे पण वाचा
विराट हिंदू संमेलनास महिला वर्गाने मोठ्या संखेने उपस्थित राहावे – सौ. देवयानी काळे
नाशिक tcs प्रकरणातील मास्टर माइंड निदा खान फरार
पंचांनाच दंड का?
स्टीवर्ट यांचा स्पष्ट सूर आहे की, सामन्यात उशीर होत असेल तर त्याची जबाबदारी पंचांवरच येते. त्यांनी सल्ला दिला की, ‘पंचांच्या निष्काळजीपणामुळे सामने लांबत आहेत. जर पंचांवर दंड ठोठावला गेला तर ते नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतील. सध्या फक्त कर्णधारांनाच दंड ठोठावून त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले जात आहेत, पण त्यामुळे काहीही फरक पडत नाही.’
पाच कर्णधारांवर आतापर्यंत दंड
आतापर्यंत आयपीएल २०२६ मध्ये पाच कर्णधारांना संथ गतीने गोलंदाजी केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याला दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे तर हार्दिक पांड्या, अजिंक्य रहाणे, शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांना प्रत्येकी एक वेळा दंड ठोठावण्यात आला आहे. या सर्व कर्णधारांकडून आतापर्यंत एकूण ८४ लाख रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले आहेत.
बदललेले नियम
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, आयपीएल २०२५ पूर्वी कर्णधाराला तीन वेळा संथ गतीचा नियम मोडल्यास एका सामन्याची बंदी होत असे. मात्र हा नियम बदलून आता फक्त दंड आणि डिमेरिट पॉइंट्सची यंत्रणा लागू करण्यात आली आहे. निलंबनाची भीती नसल्याने कर्णधार अधिक आरामशीर झाल्याचे दिसून येते.
आयपीएल २०२६ मध्ये सामन्यांचा वाढता कालावधी हा क्रिकेटप्रेमींसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. एमसीसीने ही बाब गांभीर्याने घेतली असून पंचांनाच दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे. आता बीसीसीआय या शिफारशीवर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तोपर्यंत क्रिकेटप्रेमींना रात्री उशिरापर्यंत जागून सामने पाहण्याची वेळ येत राहणार आहे.













